समृद्धी महामार्गावर पुरोहीतांच्या बुद्धीची अधोगती
– अपघातस्थळी महामृत्युंजय यंत्राची स्थापना
बुलढाणा : नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या मार्गाचे लोकार्पण केल्यापासून आतापर्यंत ९५० हून अधिक छोटे मोठे अपघात झाले आहेत. यातील सर्वाधिक अपघात हे जिल्ह्यात झाले आहेत. त्यामुळे या अपघाताच्या ठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली. ही घटना वा-यासारखी पसरताच सुमृद्धी महामार्गावर पुरोहितांच्या बुद्धीची अधोगती झाली, अशी चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे.
जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर एका खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. यानंतर या मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासनस्तरावरून अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यातील सर्वात जास्त घटना या टायर फुटल्याने झाल्यामुळे परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी आणि नागपूर येथे टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली.
समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे काही लोकांकडून आपल्या बुद्धीची अधोगती दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करून सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा घाट बांधून लोकांना अंधश्रद्धेत ढकलण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणित मार्गाच्या वतीने बस अपघातात मृत्यू झालेल्या २५ जणांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी व भविष्यात या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे. याला जवळपास दीडशे महिला आणि पुरुषांनी मिळून या महामृत्युंजय यंत्राची स्थापना केली आहे. याठिकाणी सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जपही करण्यात आला असल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. अनेक खाजगी प्रवाशी वाहनावार श्री स्वामी समर्थ, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा लिहिलेल्या गाड्यांचे अपघात होऊन लोकांचे मृत्यू होतात कसे असा प्रश्नही लोकांमध्ये उपस्थित होताना दिसत आहे. तसेच महामृत्युंजय मंत्र ज्या व्यक्तीने लिहला त्याचा मृत्यू झाला कसा अशी चर्चा करून लोक खिल्ली उडवताना दिसत आहेत.