डॉ. प्रा.श्रावण देवरे सर! एव्हाना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे तें कराल का?

0 145

डॉ. प्रा.श्रावण देवरे सर! एव्हाना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे तें कराल का?

 

✍️अनंतराव सरवदे,

सेवा निवृत्त तहसीलदार तथा लेखक विद्रोह वंचितांचा कोषाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा बीड 

 

प्राध्यापक डॉक्टर श्रावण देवरे सर! एकदा इमाने इतबारे सांगा, आपण सर्व फुले शाहू आंबेडकरांचे पाईक. अनुयायी. भाजप आणि आर एस एस आपले सर्वांचे पारंपारिक मुख्य शत्रू. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम  ३४० द्वारे निर्माण केलेल्या संविधानिक आरक्षणाचे लाभार्थी. हे जर सर्वांना मान्य असेल, आरक्षणाचे लाभार्थी, पण जों भाजप आणि आरएसएस, ओबीसींचे आरक्षण कमी करतो. त्या भाजपाला सत्तेमध्ये बसवण्यासाठी मतदान का करतो? आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी, भटके विमुक्त हा भाजपाचा मूळ डीएनएचं आहे असे कोणत्या आधारे म्हणतात?

आरक्षणाचा लाभार्थी ओबीसी, आणि तो जर भाजप आर.एस.एस.ला मजबूत करत असेल, पूर्वी पासून भाजपच्या पारड्यात मतें टाकत असेल, तर तुमच्या हितां साठी,स्वार्थासाठी, ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी चाळीस वर्षे राजकीय सत्तेचा त्याग केला. हे पूर्ण सत्य नाही का? ओबीसी मधला, माळी धनगर वंजारी त्याने वंचित बहुजन आघाडीला किंवा त्या पूर्वी भारिप बहुजन महासंघाला कोण कोणत्या मतदारसंघात कोणत्या साली कोणत्या निवडणुकीत मतदान करून निवडून दिले हे सांगा! उलट पक्षी ओबीसीच्या आरक्षणासाठी 19 डिसेंबर 2020 व 23 डिसेंबर 2022 रोजी वंचित बहुजन आघाडीने तालुका, जिल्हा, विभाग आणि मंत्रालया पर्यंत आंदोलने केली. ओबीसी साठी अटक करून घेणारे आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये प्रवास करणारे पहिले ऍड बाळासाहेब आंबेडकर आहेत हे लक्षात ठेवा! तुम्ही सर्व ओबीसीने तुमचेच आरक्षण वाचविण्यासाठी किती, केव्हा कुठे मोर्चे आंदोलने केली? जरा हे सांगाल का? मंडल आयोग ओबीसी साठी कोणी मिळवून दिला आहे हें तर देशभर सर्वज्ञात आहेच! त्या बद्दलचा इतिहास वेगळा सांगण्याची गरज नाही आहे

8 फेब्रुवारी 1987 ला रिडल्सच्या प्रकरणात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय 12 लाखांचा मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा हुतात्मा चौका समोर अडवला. तिथे सभा झाली. पण दिनांक 9 फेब्रुवारी 1987 रोजी मा. छगन भुजबळ महापौर असताना, व शिवसेनेचे माझगाव विधानसभेचे आमदार असताना, हुतात्मा चौक गोमूत्र, शेण,दही आणि काळी माती टाकून अपवित्र झालेला हुतात्मा चौक स्वच्छ करून पवित्र केला. ही कृती कोणत्या मनोवृत्तीची निदर्शक आहे? ही प्रवृत्ती ही मनोवृत्ती मनुस्मृति धारकांची आहे, आर. एस.एस. वाल्यांचीं आहे कीं, फुले,शाहू,आंबेडकरांच्या समतेच्या विचारांची आहे? या घटनेला आज छत्तीस वर्षे होत आहेत. छगन भुजबळ साहेबांनी या चुकांची कधी माफी मागितली आहे का?

डॉक्टर प्रा.श्रावण देवरे सर, तुम्ही अजूनही ऍड.बाळासाहेब आंबेडकरांचे विधान, भूमिका नीटपणे ऐकली आहे का?
ते म्हणतात, ” ओबीसींचे वेगळे ताट, आणि मराठा यांचे वेगळे ताट ” ही भूमिका ओबीसी विरोधी आहे का?
आजही ऍड. प्रकाश आंबेडकरांचे विधान आहे, ”
===================
“ओबीसीच्या विद्यार्थ्यांचीं शिष्यवृत्ती खंडित करू नका”. त्यांना शिष्यवृत्ती दिली गेली पाहिजे “. त्यांचे एक्स अकाउंट पहा!
प्रा. डॉ.देवरे सर, तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या सतत विरोधी मतदान करता, आणि तुमचें हीत,स्वार्थ आला, कीं, ऍड बाळासाहेब आंबेडकरांनीं आम्हाला मदत करावी,सहकार्य करावे असे म्हणता”. हे कुठल्या विचार सरणीचे द्योतक, प्रतिक आहे. तुम्ही आरक्षणासाठी केवळ भाजप- संघा सारख्या शत्रूला जवळ करता, तुम्ही त्यांच्या सुरक्षित छावणीत वावरता,सतत स्थिरावलेले असता. तुमची मते भाजपला देता, तुमची मते राष्ट्रवादी, काँग्रेसला देता? हा संधी साधूपणा तुमच्या कोणत्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित आहे? मग ऍड. प्रकाश आंबेडकर जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाहीत असे विधान केले आहे, तसा त्यांच्याकडे प्लॅन आहे, तर मग तुम्ही सर्व ओबीसी वंचित बहुजन आघाडी आणि “आम्ही सर्व ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत ही घोषणा का करत नाही? म्हणजे तुम्ही भाजप संघाच्या गोटात. आणि वंचित बहुजन आघाडी नेहमी राजकीय विजन वासात? ही विसंगती कशी अपेक्षित आहे आपणाला? आपण म्हणता,”ऍड प्रकाश आंबेडकर ओबीसीच्या शत्रूशी हात मिळवणी करताहेत “.आणि तुम्ही तर मनुस्मृतीचे समर्थक, संविधान बदलण्याची भाषा करणारे आर.एस. एस.ला बळ देणारे, हिंदूx मुस्लिम दंगली करायला लावणारे, मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष करायला लावणारे, धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्षास प्रोत्साहन देणाऱ्या पक्षांच्या शक्तीच्या बरोबर कशी हात मिळवणी करता?

प्राध्यापक श्रावण देवरे सर, तुम्ही समतेच्या विचारांची शपथ घेऊन सांगा, फक्त मागील चार-पाच वर्षांपासून, दलित बौद्ध महिला यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार,बलात्कार,खून याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात किती ओबीसीच्या समूहाने, आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत दलित बौद्ध आदिवासी अन्यायाला वाचा फोडली? तुम्ही दलित, बौद्ध,आदिवासी आणि मायक्रो ओबीसी यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध साधे निषधाचे पत्रक जर काढत नसाल, आणि ऍड. बाळासाहेब आंबेडकरांची मदत, सहकार्य मागत असाल,तर तुमच्या या वृत्ती आणि प्रवृत्तीला फक्त आमच्यासाठी आणि आमच्या हितासाठी असेच म्हणावे का?*

बलात्कार अत्याचार खून “माधव”
नावाच्या बड्या ओबीसीचे होत नाहीत. हे सर्व अन्याय अत्याचार दलित,बौद्ध,आदिवासी, छोटा ओबीसी यांनाच सहन करावे लागतात. अत्याचाराच्या विरोधी, लढा, चळवळ,संघर्ष त्यांनाच करावा लागतो. म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीतून, तात्विक दृष्टिकोनातून आपले वैचारिक स्थान कोठे आहे? हे जर स्पष्ट केले तर लाखो दलित बौद्ध आदिवासी मुस्लिमांना मनस्वी समाधान वाटेल! म्हणून हितांची जेव्हा गोष्ट येथे तेव्हा फुले शाहू आंबेडकरवादी, आणि वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत मतदान करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही भाजप संघवासी? ही अशी वैचारिक विसंगती अवलंब करून चालणार नाही!

मानवतेचा सामाजिक समतेचा जातीव्यवस्था निर्मूलनाचा, आणि सम्यक समाज व्यवस्था निर्माण करण्याचा वैचारिक वसा आणि वारसा घेऊन लढावे लागेल सर! जरा दूरदृष्टीने लढा उभारावा लागेल! गरज लागेल गरज भासेल तेव्हा, तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा आवाहना प्रमाणे मदत करा, सहकार्य करा, मार्गदर्शन करा,असे म्हणणे कितपत संयुक्तिक वाटते?

Leave A Reply

Your email address will not be published.