अवकाळी पावसामुळे अनेक कुटुंब उघड्यावर
लातूर : जिल्ह्यातील औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतीसह घरांची पडझड झाली. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. याकडे कोणता लोकप्रतिनिधी बनतोय ना शासन प्रशासन.
किल्लारी येथिल शेतकरी साखर कारखाना भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या अवकाळी पावसामुळे तिथे राहणाऱ्या कामगारांच्या घरांचे नुकसान झाले. या कामगारांना कारखाना प्रशासनाने कामावरून कमी केल्यामुळे यांच्यावर आधीच उपासमारीची वेळी आलेली आहे. त्यात या अवकाळी पावसाने त्यांच्या घरावर घाला घातल्याने ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. गेली अनेक वर्ष हे कर्मचारी आपल्या हिश्याचा पैसा मिळावा म्हणून कारखाना प्रशासनाशी न्यायालयीन लढा देत आहेत. या कामगारांच्या हाताला काम नसल्याने हे त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून आपला उदरनिर्वाह भागवत असताना या अवकाळीने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात तिथे जाण्यासाठी त्यांना रस्ता आहे ना राहण्यासाठी व्यवस्थित घराचा आसरा. त्यांच्या घामाचा दाम हे कारखाना प्रशासन देत नाही याकडे कोणताही राजकीय पुढारी पाहत नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा कोणी वाली आहे का असा प्रश्न पडतो.
शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या घरांचा अवकाळीने नायनाट झाला असताना देखिल कारखाना प्रशासन केवळ पाहाणी सुध्दा करू शकले नाही त्यामुळे हे प्रशासन किती निर्दयी आहे असं कर्मचारी चर्चा करत आहेत. सरकारने या कर्मचाऱ्यांचे पालकत्व स्विकारून यांच्याकडे थोडेसे लक्ष दिल्यास हे कर्मचारी नव्या जोमाने जगण्याचा नवा किरण शोधतील. त्यामुळे ज्यांना कारखाना प्रशासन व राजकीय प्रतिनिधिनी झिडकारले आहे त्यांना हे सरकार तरी स्विकारणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.