उजेड येथे महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव – ७५ वर्षापासून नियमितपणे यात्रेला सुरूवात

0 42

उजेड येथे महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव

– ७५ वर्षापासून नियमितपणे यात्रेला सुरूवात

 

लातूर : २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे महाराष्ट्र दिन किंवा मराठवाड्यात १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन यादिवशी लातूर जिल्ह्यातील उजेड येथे महात्मा गांधी यांची यात्रा भरते. यादिवशी गावातील प्रत्येकजण महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करतो. ही यात्रा मागील जवळपास ७५ वर्षापासून नियमितपणे भरते.

जिल्ह्यातील आठ हजार लोकसंख्या असलेल्या उजेड या गावात २४ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी बाबा यात्रा महोत्सव असतो. हे पाच दिवस गाव राष्ट्रप्रेमाने पुर्ण वाहून निघते. यावेळी गावाला पूर्ण यात्रेचे रुप येत असून घरोघरी पावणे-रावळे येतात. तसेच या दिवशी लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली आपल्या माहेरी येतात. या यात्रेनिमित्त २४ जानेवारी रोजीच महात्मा गांधीच्या मूतीर्ची स्थापना करण्यात येते. या दिवशी गावात सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर होते. गावात येणारा प्रत्येक व्यक्ती महात्मा गांधीच्या मुर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करतो.

लातूरपासून ६० किमी अंतरावर असणाऱ्या उजेड मध्ये या यात्रेनिमित्त जागोजागी मिठाईची दुकाने थाटली जातात. यात्रेत जेलबी तर क्विंटलने विक्री होते. गांधी बाबाच्या या यात्रेत वेगवेगळे रहाट पाळणे येतात. तसेच गावात स्पिकरवर मोठ्या आवाजात देशभक्तीपर गीते लावल्याने गाव राष्ट्रप्रेमाच्या चैतन्याने बहरलेले असते.

यावर्षीच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात २३ जानेवारी रोजी ग्राम स्वच्छतेने करण्यात आली. २४ जानेवारी रोजी महात्मा गांधीच्या मूतीर्ची स्थापना झाली, त्यानंतर सर्व रोग निदान व उपचार आणि रक्तदान शिबीर झाले. बुधवार दि. २५ जानेवारी रोजी शालेय क्रीडा स्पर्धा व भजन (दरवर्षी पशु चिकित्सा होते पण यावर्षी लम्पिमुळे रद्द केल्याचे सांगितले.) २६ जानेवारी रोजी झेंडावंदन प्रभात फेरी, संगीत वाद्य गायन व बक्षीस वितरण, रात्री ९ वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम, २७ जानेवारीला जंगी कुस्त्याचे सामने, रात्री सेवालय संस्थेच्या वतीने हॅपी म्युझिक शो आणि ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून यात्रेचा समारोप होतो.

यात्रेचा इतिहास

उजेड मधील लोकं सांगतात, स्वातंत्र्यपूर्व काळात गावात पीराची यात्रा भरायची १९४८ ला हैदराबाद मुक्ती संग्रामातील पोलिसांच्या कारवाईनंतर ही यात्रा बंद झाली. १९५० ला देश प्रजासत्ताक झाल्यानंतर या गावातील लोकांनी एकत्र येऊन यात्रे बाबत मंथन केले. त्यातून गावात पुन्हा यात्रा सुरु करायची तर मग कोणाच्या नावाने… सर्वांना मान्य असलेले नाव ठरले महात्मा गांधी आणि तारीख ठरली २६ जानेवारीचा आठवडा… या यात्रेचे नाव ठरले महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव, यामुळे २६ जानेवारी १९५१ पासून या आगळ्या वेगळ्या यात्रेची सुरुवात झाली.

यात्रा निर्णय सुरू करण्याचा

गावचे पहिले सरपंच शिवलिंग स्वामी, असामी चांद पटेल, रामराव रेड्डी, गोविंद मास्तर, माधवराव जाधव, विश्वंभरराव पाटील, अण्णाराव बिराजदार, गोविंदराव चिमनशेट्टे, व्यंकटराव ढोबळे, अंबादास जाधव या सर्व गावकऱ्यांनी तेव्हा ठरवले की, ना कोण्या देवाची, ना कोणा धमार्ची, आपण लोकशाहीची यात्रा महात्मा गांधी बाबांच्या नावाने २६ जानेवारीला सुरु करायची.

कोरोना काळ वगळता यात्री नियमितपणे सुरू

२६ जानेवारी १९५१ पासून सुरू झालेली यात्रा करोना काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गावकरी एकत्रित येऊन वर्गणी गोळा करून ही जत्रा उत्साहाने पार पाडतात.

Leave A Reply

Your email address will not be published.