छत्रपती संभाजीनगर येथे २४ एप्रिल रोजी चंद्रशेखर राव यांची सभा
छत्रपती संभाजीनगर : भारत राष्ट्र समिती पक्षाला आता मराठवाडय़ात आकार येऊ लागला आहे. शेतकरी संघटनेतील काही कार्यकर्ते, माजी आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले अनेक नेते चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असून ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश करत आहेत. २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ‘ बीआरएस’च्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षे काम करणारे कदीर मौलना तसेच गंगापूर मतदारसंघातील अण्णासाहेब माने यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे शंकर अण्णा धोंडगे, वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे यशपाल भिंगे यांच्यासह शेतकरी संघटनेतील नेत्यांना या पक्षाचे वेध लागले. त्यांनी ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश घेतला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक लढविण्यास इच्छुक पण यश न मिळालेल्या नेत्यांची संख्या मोठी आहे.