वाडी ग्रामपंचायतचे सदस्य केवळ मेनाचे पुतळे असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा
खामगाव (नंदकिशोर भारसाकळे) : तालुक्यातील वाडी हे आठ दहा हजार लोकसंख्येच गाव असून या गावातील ग्रामपंचायत कार्यालय हे विना ग्रामसेवकाचा कार्यभार चालवत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता या ग्रामपंचायत हद्दीत रहीवाशी असलेल्या नारिकांच्या मुलभूत गरजांची पूर्तता पुर्ण करू न शकणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. वाडी गावातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असून या ग्रामपंचायतची दर पाच वर्षांनी केवळ सत्ता हस्तांतरण होते. मात्र, गावचे मुळ प्रश्न जैसे थे राहत असल्याने ग्रामपंचायत सदस्य हे केवळ मेनाचे पुतळे आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
एकीकडे देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असताना दुसरीकडे वाडी ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडताना दिसत आहे. याकडे ग्रामपंचायत लक्ष देतेय ना कोणता पुढारी त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या गावात नागरिकांना पिण्याचे पाणी खाजगी टॅंकरद्वारे विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतकडून त्यांचे किस्से भारी केली जात असल्याची चर्चा हे नागरिकांना आपआपासामध्ये करताना दिसत आहेत. वाडी ग्रामपंचायतने पारखेड येथून पाणी घेतले असून ती योजना गेली पाच वर्ष जैसे थे असल्याने यातले पाणी नेमके कुठे मुरले अशी कुजबूज नागरिकांमध्ये चालू आहे. ग्रामपंचायतने पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून एक विहीर अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवण्याचा मोठा अट्टाहास केला मात्र तो निर्रथक ठरल्याचे दिसत आहे. कारण या विहरीतून दहा दिवसांनी पाणी पुरवठा व्हायचा आता तर कहरच झाला आहे, आता हेच पाणी दर पंधरा दिवसांनी सोडण्याचा निर्णय ग्रामपंचायने घेतल्यामुळे कोणी पाणी देता का पाणी असं म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
गावच्या नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करू न शकणाऱ्या या वाडी गावात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी जागा व स्मशानभूमी नाही तरीही याकडे ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करताना दिसत आहे. या गावापासून हाकेच्या अंतरावर काॅग्रेस व भाजपच्या लोकप्रतिनिधी घरे असतानाही जर गावच्या घशाला कोरड पडत असेल तर देशाला महासत्ता करण्याची स्वप्ने बघणे म्हणजे हाल्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे असं स्थानिक गावकरी एकांतात गावरान तडका मारताना दिसत आहेत.