लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार
– तुळजापूर तालुक्यात मराठा समाजाचा निर्णय
तुळजापूर : लोकसभा निवडणुकीसाठी तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातुन दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १२) सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाची
धाराशिव लोकसभा मतदारसंघ नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातुन दोन उमेदवार लोकसभेसाठी उभे करण्याचा निर्णय झाला. यासाठी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विभागनिहाय बैठक घेण्याचे ठरले. या उमेदवारांसाठी अनामत रक्कम गावातुन लोकवाट्यातुन भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लोकसभा मतदार संघासाठी प्रत्येक बुथ वाईज कमिटी स्थापण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही प्राथमिक बैठक असून यानंतर विधानसभेसाठी व्यापक बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत अनेक गावच्या उमेदवारांची नावे सकल समाजाकडे देण्यात आली.
या बैठकीत मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचे ठरले. या बैठकीस सज्जनराव साळुंके, महेश गवळी, जीवनराजे इंगळे, कुमार टोले, तेजस बोबडे, अर्जुन साळुंके, अजय साळुंखे, प्रशांत सोंजी, अण्णासाहेब क्षिरसागर, दत्ता सोमाजी, सत्यजीत साठे, हरिभाऊ मोरे यासह शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.