मराठा समाजाने राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास जाऊ नये
– मराठा प्रवाह समन्वय समितीचे अवाहन
परभणी : मराठा समाजाचा सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी उपयोग करून घेतला आहे. या सत्ताधार्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावे या मागणीकडे दुर्लक्ष करून न टिकणारे आरक्षण देऊन समाजाला विकासाच्या प्रवाहातून दूर ठेवले आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास जाऊ नये, असे अवाहन मराठा प्रवाह समन्वय समितीने केले आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी १९८२ पासून सुरू आहे. या मागणीकडे सर्वच राजकीय पक्षाचे सत्ताधारी व विरोधक यांनी दुर्लक्ष करून सत्ता आपल्याच हातात राहावी यासाठी अधून मधून न टिकणारे आरक्षण दिले. भविष्यात कायमचे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ महिन्यापासून गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सगळ्या सोयर्यासह आरक्षण देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करावं या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या हक्काच्या मागणीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. या काळात दोन वेळेस विधानसभेचे अधिवेशनही झाले.
या अधिवेशनातही या मुद्यांवर चर्चा झाली नाही तर समोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागणी नसलेले तसेच न टिकणारे दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. हा सर्व प्रकार मराठा समाजाची दिशाभूल व बनवाबनवी करण्याचा आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मराठा समाज बांधवांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास जाऊ नये, असे अवाहन मराठा प्रवाह समन्वय समितीने केले आहे.