विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली भाजीपाला विक्रेत्यांशी चर्चा
सर्वांनी मिळून ठरवली पुढील रणनीती
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या स्थलांतर प्रश्नी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजीपाला विक्रेत्यांशी भेटून चर्चा केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतल्यावर सर्वांनी मिळून पुढील रणनीती ठरवली.
यात प्रामुख्याने भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना एकाच ठिकाणी व्यवसायाची व्यवस्था करून द्यावी असे ठरले. यात प्रामुख्याने शेड, बसायला ओटे, पिण्याच्या पाण्याची सोय,दिवाबत्ती, स्वच्छता गृह, सुरक्षा अश्या मूलभूत सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्याव्यात असे ठरले.
कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून दररोज २० रुपये प्रमाणे कर वसूल करते. मात्र कोणत्याही सुविधा भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मिळत नाहीत त्या सुविधा उपलब्ध होईपर्यंत सोमवार दि. ७ ऑगस्ट २०२३ पासून कोणत्याही भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून ‘ते’ २० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीने वसूल करू नयेत.
यासोबतच गांधी मार्केमधील महात्मा फुले भाजी मंडईचे पुनरुज्जीवन करणे, खाडी नाल्यावरील जागेचे पुनरुज्जीवन तसेच गणेशपार, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नवीन भाजीपाला व फळ विक्री व्यवस्था निर्माण करावी.
वरील सर्व मुद्द्यांना विचारत घेऊन सोमवारी ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता भाजीपाला विक्रेते व विविध पक्षांचे पदाधिकारी हे उपविभागीय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
आजच्या बैठकीत भाजीपाला विक्रेते, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष देवराव लुगडे, जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, शहराध्यक्ष राजेश विभूते, कॉंग्रेस शहराध्यक्ष बहादुर भाई, एम.आय.एम. तालुकाध्यक्ष शेख शरीफ, मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, माकप चे कॉ.पांडूरंग राठोड, कॉ.परमेश्वर गित्ते, वंचित बहुजनचे जिल्हा महासचीव मिलिंद घाडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) मेहबुब कुरेशी, सय्यद फेरोज, राजू शिंदे, संतोष चौधरी, ऋषीकेश बारगजे आदी मान्यवर उपस्थित होते.