छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणा-या विश्वस्तांच्या तोंडाला काळे फासू; संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांचा इशारा
छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणा-या विश्वस्तांच्या तोंडाला काळे फासू; संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांचा इशारा
पुणे : चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी लावलेल्या माहीती फलकात संभाजी महाराजांविषयी अवमानकारक लिखाण करण्यात आले आहे. या फलकावर संभाजी महाराजांचा वध झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे संभाजी ब्रिगेड सतिश काळे यांनी हा फलक तात्काळ हटवा अन्यथा विश्वस्तांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला आहे.
मोरया गोसावी मंदिरामध्ये लावलेल्या फलकावर छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाला असा शब्दप्रयोग केला आहे.
वध हा शब्द जाणिवपूर्वक अवमान करण्यासाठी वापरला जात आहे. संभाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेले बलिदान असल्याची भावना बहुजनांमध्ये आहे. त्यामुळे मंदिरामधील अवमानकारक मजकूराने शहरातील बहुजनांच्या भावना दुखाविणाऱ्या असून त्वरीत हा फलक काढावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. अन्यथा मोरया गोसावी देवस्थानच्या विश्वस्तांना तोंडाला काळे फासून निषेध करू, असा इशारा काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी शत्रुंविरोधात लढा दिला. अत्यंत शूर पराक्रमी योद्धा म्हणून संभाजी महाराजांचा नावलौकिक आहे. प्रखर तेजोमय बुद्धीने ते शुत्रंवर मात करत होते. अशा राजाला महाराष्ट्रासह देशभरातील बहुजनांची लोक आपले प्रेरणास्थान मानत आहेत. असे प्रेरणास्थान असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी अवमानकारक गोष्टी पसरविण्याची मनुवादी वृत्ती अद्यापही कार्यरत आहे. त्यांना वेळोवेळी धडा शिकविण्याचे काम केले आहेच.
मात्र तसाच एक प्रकार चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात घडला आहे. या मंदिरात नारायण महाराज देव यांच्याविषयी माहिती देणारे माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये एका फलकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाला असा अवमान करणारा शब्द वापरला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी बहुजनांच्या हक्काच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी लढा दिला आहे. शत्रुवर आक्रमक चाल करून चारी मुंड्या चीत केलेले आहे. मात्र काही मनुवादी वृत्तीच्या षडयंत्राने ते शत्रुंच्या तावडीत सापडले.त्यांना बलिदान द्यावे लागले. त्यामुळे वध हा शब्द अवमानकारक आहे, असे संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मंदिर व्यवस्थापनाने हा माहिती फलक त्वरीत काढावा, यासाठी दोन दिवसाची मुदत दिली असून या मुदतीमध्ये हा फलक हटवून महाराजांप्रती आदरयुक्त माहिती देणारा फलक उभारावा असे सांगण्यात आले आहे. जर दिलेल्या मुदतीत हा फलक निघाला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करत संबंधीत विश्वस्तांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांनी दिला.