रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी घेण्यात आली पंचप्राण शपथ
अलिबाग, दि.९ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप निमित्त संपूर्ण देशभर ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुधवारी (दि.९) रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पंचप्राण शपथ घेण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ‘माझी माती माझा देश अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमानुसार गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियान अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पंचप्राण शपथ कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले होते.
बुधवारी रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्थरावर पंचप्राण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी एकत्रित येत, “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करु, देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु, भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु” अशी पंचप्राण शपथ घेतली.