मराठा मते मिळवण्यासाठी केलेली रणनीती ठरली फोल – मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मराठा समाजाने फिरवली पाठ
मराठा मते मिळवण्यासाठी केलेली रणनीती ठरली फोल
– मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मराठा समाजाने फिरवली पाठ
बीड : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्याने बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना मराठा समाजाच्या मताचा फटका बसेल या धास्तीने धनंजय मुंडे यांनी परळी येथे मराठा समन्वयकांबरोबर बैठका घेण्याची रणनीती आखली आहे. या बैठकीत त्यांनी मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन दिले असले तरी या बैठकीकडे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने मोजकेच लोक उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी आखलेली रणनीती फोल ठरल्याचे बोलले जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीतून निर्माण झालेल्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करीत त्यांना काळे झेंडेही दाखविले गेले. याचा फटका बसू नये यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महासंवाद दौºयावेळी परळीत येऊन येथील नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य धोक्यात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेवर फुंकर घालण्याचा अनेकांकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे प्रमुख स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे सांगण्यात येत आहे.
अंबाजोगाईजवळील चतुरवाडीत आयोजित मेळाव्यात त्यांनी मोबाईल फोनवरून संपर्क साधत धनगर आरक्षणाचा प्रश्नावर आश्वासन दिले. त्या सध्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक आणि मराठा नेत्यांच्या घरी भेटी देऊन त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देत असल्याचे दिसत आहे. त्यांनी माजलगाव येथे प्रकाश सोळंके यांची भेट घेत माजलगाव मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी प्रकाश सोळंके यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत माजलगाव मतदार संघातून लीड देण्याचे आश्वासन दिले असले तरी या मतदार संघात आ. सोळंके यांच्यावर मतदार नाराज असल्याचे दिसत आहे. यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षाणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चूकीच्या घटना घडल्या.
चले जाव चले जाव
जिल्ह्यात मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचे दिसत आहे. अनेक गावात चले जाव चले जावच्या घोषणेमुळे पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांना काढता पाय घेत परत फिरावे लागत आहे. केज तालुक्यात त्यांना विरोध झाल्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने समाजाच्या भावना तिव्र होत आहेत. यामुळे या भावनाचा मतावर परिणाम होणार का याकडे सर्वाचे लक्ष आहे.