नागपूर : येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर तुफान हल्ला चढवला. आमचं हिंदुत्व हे शेंडी, जानव्याचं हिंदुत्व नाही. त्यांचे हिंदुत्व हे गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. भाजपने त्यांचं हिंदुत्व काय आहे हे सांगावं. राज्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असताना मुख्यमंत्री हे देवदर्शनाला गेले.आम्ही सातत्याने राम मंदिरासाठी कायदा तयार करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी मोदी सरकारकडून कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. राम मंदिराच्या कायद्याबाबत शांत बसले होते. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रेयासाठी टिकोजीराव फणा काढून बसले. नुसतं वणवण फिरला म्हणजे काम करतो, असे होत नाही. अस बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.