अजंनडोह येथे राजकीय पुढा-यांना गावबंदी
किल्ले धारूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुस-यांदा उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना, आमदार, खासदार तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मराठा समाजाकडून गावबंदी केली जात असतानाच आता बीड जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटताना दिसत असून अंजनडोह गावातील नागरिकांनी पुढा-यांना केलेल्या गावबंदीचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.
बीड जिल्ह्यात आरक्षणाची ठिणगी पडली असतानाच किल्ले धारूर तालुक्यात असणा-या अंजनडोह या गावामध्ये मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत एकाही पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांने गावात येण्याचा प्रयत्न करू नये असे या निवेदनात म्हटले आहे. लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन घेतला आहे. सकल मराठा समाजाने मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या माहितीचे निवेदन गावचे सरपंच प्रमोद सोळंके यांनी किल्ले धारूर येथील मा. नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक बास्ठे यांना दिले आहे. यावेळी प्रमोद सोळंके, अजय सोळंके, अविनाश ठोबरे, विशाल रेपे हे उपस्थित होते.