छात्रभारतीच्या चाळीसाव्या अधिवेशनाचे मुंबईत आयोजन – छात्रभारतीच्या लढ्यात सामिल होण्यासाठी छाया काविरे यांचे तरुणांना आवाहन

0 74

छात्रभारतीच्या चाळीसाव्या अधिवेशनाचे मुंबईत आयोजन

– छात्रभारतीच्या लढ्यात सामिल होण्यासाठी छाया काविरे यांचे तरुणांना आवाहन

 

पुणे : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणारी ध्येयवादी तरूणांची संघटना छात्रभारतीची स्थापना १८ डिसेंबर १९८३ साली झाली. गेली ४० वर्षे महाराष्ट्रातील ग्रामीण, गरीब व कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी छात्रभारती लढत आहे. याचे चाळीसावे अधिवेशन मुंबईत येथे आयोजित केले असून त्याला उपस्थित राहण्याचे आवाहन छाया काविरे
राज्यसचिव, छात्रभारती यांनी केले आहे.

शिक्षणाच्या खाजगीकरणाला, बाजारीकरणाला छात्रभारतीचा तीव्र विरोध आहे. सरकारकडून शिक्षणावर केलेला खर्च हा खर्च नसून ती राष्ट्र उभारणीसाठीची गुंतवणूकच असते. त्यामुळे सर्वांना सक्तीचे, समान, गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत देणे ही सरकारची जबाबदारी आहे, ही छात्रभारतीची ठाम भूमिका आहे. मात्र, आजवरच्या सरकारांची भूमिका बघता त्यांनी शिक्षणासारख्या मूलभूत विषयाकडे प्रचंड दुर्लक्ष केले आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या जबाबदारीतून हात झटकत शिक्षणाच्या खाजगीकरणाला बळकटी दिली आहे.

सरकारी शाळा बंद पाडून त्याऐवजी खासगी शाळा/कॉलेज उभे करण्यासाठी धोरणे आखली जात आहेत. विद्यार्थांना वेळेवर स्कॉलरशिप नाही, स्पर्धा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता नाही. आताचं सरकार तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून हद्दपार करण्याचं काम चोखपणे पार पाडत आहे. त्यामुळे आजची शिक्षणव्यवस्था ही श्रीमंताची बटिक आहे. म्हणून शिक्षण प्रचंड महागले आहे. हातावर पोट असणारे, छोटे छोटे व्यावसायिक, मजूर, कामगार, शेतकरी, सामान्य जनता यात भरडली जात आहे. एकीकडे गोरगरिबांच्या मुलाबाळांना शिक्षण घेणे कठीण झालं आहे तर दुसरीकडे धनदांडग्यांची, राज्यकर्त्यांची मूलबाळं मात्र परदेशात शिकायला जात आहे. शिक्षणक्षेत्राची इतकी गंभीर परिस्थिती असताना देखील राज्यकर्ते जनतेच्या मूलभूत प्रश्नांऐवजी भलत्याच गोष्टीवर राजकारण करत आहेत.

या राज्यकर्त्यांना शिक्षणाच्या विषयावर लक्ष केंद्रित करायला लावण्याचं काम छात्रभारती करते. छात्रभारती ही कोणत्याही पक्षाची किंवा नेत्याची संघटना नाही. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ही एक चळवळ आहे. यावर्षी मुंबई येथे तरुण विद्यार्थ्यांसाठी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशन अभिनेत्री अमृता प्रितम, दिग्दर्शक सचिन गोस्वामी, दिग्दर्शक नितीन वैद्य, दिल्ली विश्वविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण यादव, मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी आदी विचारवंत मार्गदर्शक करणार आहेत.

शहीद ए आझम यांचा तरुणाईवर प्रचंड विश्वास होता, तेव्हा भगतसिंगांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करूण एका नव्या भारताची नांदी करूया. गांधीजींच्या सत्य अहिंसेच्या मार्गानेच विद्यार्थ्यांची एकजूट आणि दबावगट आजच्या राजकारण्यांना ताळ्यावर आणु शकते. आपण तरूण विद्यार्थीच फुले-शाहू-आंबेडकरानी दिलेला शिक्षणाचा अधिकार झगडून मिळवू शकतो. आपणच बदल घडवू शकतो… तेव्हा बदलासाठी सज्ज व्हा.! छात्रभारतीच्या ४० व्या अधिवेशनात सहभागी व्हा..! असे छाया काविरे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.