शिंदे-फडणवीसांसमक्ष अभीमन्यू पवारांची राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी धडधडीत बनवाबनवी ? विवाह झालेले असताना सामूहिक विवाहसोहळ्यात दोघांचे पुनर्विवाह !

0 719

शिंदे-फडणवीसांसमक्ष अभीमन्यू पवारांची राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी धडधडीत बनवाबनवी ?
विवाह झालेले असताना सामूहिक विवाहसोहळ्यात दोघांचे पुनर्विवाह !

 

लातूर (जावेद शेख) : प्रेम आणि युद्धात सर्व माफ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे.मात्र आता यापुढे जाऊन राजकारण, राजकीय शक्तिप्रदर्शन यासाठी देखील कोणत्याही स्तराला जाण्याची,खालची पातळी गाठण्याची तयारी राजकारणी मंडळींची आहे असेच दिसतेय.अर्थात सध्याचे राज्यातील राजकारण पाहता सर्वाना त्याचा अनुभव येतोच आहे.मात्र धडधडीत त्याचा प्रत्यय नुकत्याच औसा येथे आमदार अभीमन्यू पवार यांनी केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आता समोर आला आहे. १० मे रोजी झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जी जोडपे शिंदे- फडणवीस यांच्या साक्षीने विवाहबद्ध झाली त्यातील दोन जणांची विवाह १० मे च्या पूर्वीच झाली होती अशी माहिती आता समोर आली असून मग संख्या वाढवून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्यासाठीच हा सामूहिक विवाह सोहळ्याच फार्स,बनाव रचला होता असाच अर्थ निघतो.आणखीन यासाठी काय काय युक्त्या केल्यात हे पुढे पुढे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच.विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,ज्यांनी हा सर्व सामूहिक विवाह सोहळा रचला ते अभीमन्यू पवार यांचे राजकीय,आर्थिक गॉडफादर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यातील दिग्गज नेते व आय.ए.एस आणि आय.पी.एस अधिकारी यांच्या समक्ष हे सर्व सामूहिक विवाहसोहळे संपन्न झाले होते.त्यामुळे या सर्वांची विशेषतः पवारांचे गॉडफादर फडणवीस यांची या राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी किंवा इतरांपेक्षा मी कसा श्रेष्ठ व कर्तृत्ववान आहे हे दाखवण्यासाठी केलेल्या केविलवाण्या प्रकारास,बनावास मुकसंमती किंवा पाठिंबा होता असाच अर्थ देखील सरळ निघतो.खरं तर विवाह म्हणजे या खाजगी बाब असतात,त्यात सहसा कोणी पडत नाही किंवा पडू नये ही आपल्याकडील संकेत आहेत.मात्र ज्यावेळी विवाहाचे राजकीय मार्केटिंग केले जाते,त्यातून राजकीय स्वार्थ धडधडीत बनवाबनवी करून साधला जातो.त्यावेळी त्याची दुसरी बाजू देखील समोर आली पाहिजे म्हणून हा प्रकार समोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.अर्थात हे पाहून जे अंध व पगारी कार्यकर्ते तथा लाभार्थी आहेत ते तुटून पडणार हे माहिती असताना या अंध मंडळींनी उघड्या डोळ्याने पाहण्याची आवश्यकता आहे.व आपल्या लाभ व स्वार्थापलीकडे देखील तत्व, जग आहे,जे चूक आहे ते चूक आहे म्हणण्याची व सत्य समजून घेण्याची गरज आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा येथे १० मे रोजी सामूहिक विवाहसोहळा संपन्न झाला.अर्थात त्या सोहळ्यात आमदार अभीमन्यू पवार यांचे सुपुत्र देखील विवाहबद्ध होणार होते.त्यामुळे एकट्या आपल्या सुपुत्राचा विवाहसोहळा शाही झाला तर प्रसारमाध्यम आणि जनतेत चर्चा होईल.पवार हे फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत हे जगजाहीर असल्याने चुकीचा संदेश जाऊन थेट फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित होऊ नयेत.आणि एक सामान्य शेतकऱ्यांचा सुपुत्राने जो आमदार झालाय त्याने एवढा शाही विवाहसोहळा आपल्या सुपुत्राचा केला कसा व कोट्यवधींचा खर्च केला कोठून असे प्रश्नःचिन्ह उपस्थित होऊ नयेत म्हणूनच ते झाकण्यासाठी सदरील सामूहिक विवाहसोहळे झाले हे अगदी उघड आहे.पुढे पुणे येथे देखील पंचतारांकित ठिकाणी फक्त पवार यांच्या सुपुत्राचा स्वागत समारोह संपन्न झाल्याने उद्देश काय होता,किंवा खरंच शेतकरी व भूकंपग्रस्त मंडळींची काळजी होती का हे आपोआप स्पष्ट होते.मात्र बोलायचे कोण ? आणी आपल्याला काय करायचय,सत्तेपुढे शहाणपण चालत नाही,आपण कांही बोललो तर आपल्याला अडकवतील ,संपवतील अशी अडचण अनेकांची आहे.त्यामुळे खर्चाची देखील चर्चा होऊ नये म्हणून ही सामूहिक विवाह सोहळे क्रीएटीव्ह फौंडेशन या संस्थेने केले असे पद्धतशीरपणे वर्तमानपत्र आणि सोशल माध्यमातून दाखवण्यात आले.या विवाह सोहळ्यापूर्वी लातुरात ही संस्था कोणालाही माहिती नव्हती हे विशेष. त्यामुळे झालेल्या मार्केटिंगमध्ये ते यशस्वी देखील झाले.खरं तर ज्यावेळी सामूहिक विवाहसोहळा संपन्न झाला.त्याच दिवशीपासून या सोहळ्यात झालेल्या खर्चापासून जी जोडपे विवाहबद्ध झाली त्यांना घेऊन बरीच उलटसुलट चर्चा सुरू होती व आज देखील सुरू आहे.अगदी या सामूहिक विवाहसोहळ्यासाठी लातूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यातील अधिकाऱ्यांना थेट पैशाचे टार्गेट दिले गेले होते असे आज देखील अनेकजण उघड उघड बोलत आहेत.आणि ज्यावेळी अश्या चर्चा उघड होत असतात त्यावेळी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही ही म्हण आपोआप तंतोतंत बसते.त्यामुळे शेतकरी, भूकंपग्रस्त यांची विवाह आम्ही केली अशी छाती बडवून कोणीही घेतली तर तथ्य व सत्य काय आहे हे स्वतःच्या मनावर हात ठेवून विचार करण्याची गरज आहे.त्यातच आता जी जोडपे विवाहबद्ध झाली त्यातील दोन जोडप्यांची विवाह ही १० मे पूर्वीच झाली होती अशी माहिती सक्षम पुराव्यानिशी समोर आली आहे.अर्थात आणखीन किती जणांची विवाह पूर्वीच झाली होती हा संशोधनाचा भाग आहे.मात्र दोघांचे झाले काय किंवा १० जणांचे झाले काय बाकी गोष्टींना अर्थच उरत नाही.सामूहिक विवाहसोहळ्यात झालेल्या विवाहापैकी रोहेश भिंगोले यांचा विवाह ४ मे रोजी चाकूर तालुक्यातील धनगरवाडी येथे संपन्न झाला आहे तर दुसरे महादेव भिंगोले यांचा विवाह ७ मे रोजी लातूर येथील विष्णुदास मंगल कार्यालयात झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही एकाच परिवारातील आहेत अशी माहिती आहे.हे दोन्ही परिवार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बोरी येथील आहेत असे समजते.

‏याबाबत या गावात जाऊन माहिती घेतली असता यावर अनेकांनी शिक्कामोर्तब केले.आणि ज्यावेळी औसा येथे संपन्न झालेल्या सामूहिक विवाहसोहळ्याचे छायाचित्र उपलब्ध करून पडताळणी केली असता आमदार अभिमन्यु पवार यांच्यासोबत काढलेल्या व गोपनीय ठेवलेल्या सामूहिक चित्रात हे दोघेजण पहिल्या रांगेत दिसून आले.खर तर ज्यांची विवाह सामूहिक झाली त्यांची नावे व फोटो सोशल मीडियावर,प्रसारमाध्यमांत कोठेही प्रकाशित झाली नाहीत,जी झालीत ते ओळखता येऊ नयेत किंवा लांबुन काढलेली किंवा एकत्रित अक्षता टाकतानाची झाली.बाकी चेहरे स्पष्ट दिसतील अशी एकही फोटो बाहेर आली नाही.अर्थात त्यात बनवाबनवी होती ही माहिती असल्यानेच की काय हे सर्व गोपनीय ठेवण्यात आले होते.आणि ज्यावेळी सामूहिक विवाहसोहळा संपन्न झाला त्यावेळी या सोहळ्यात अभीमन्यू पवार यांचे सुपुत्र वगळता,आणि आलेले दिग्गज नेते यांना सोडून इतर जोडप्याकडे कोणीही लक्ष दिले नाही,किंवा चिकित्सक नजरेने कोणीही पाहिले नव्हते हे अगदी उघड आहे.अर्थात आपल्याला काय करायचय हा भाग होताच.त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या समक्ष ही सामूहिक विवाहसोहळे संपन्न झाले.व त्यांच्या समक्ष जर उघड बनवाबनवी झाली असेल तर याचा अर्थ हे झालेले सामूहिक विवाहसोहळे राजकीय शक्तिप्रदर्शन दाखवण्यासाठी झाले हे सांगण्यास कोण्या भविष्यकाराची गरज आहे असे मुळीच नाही.शेतकरी, भूकंपग्रस्त या गोंडस नावाखाली आपला राजकीय स्वार्थ साधून घेतला गेला हे देखील उघड आहे.त्यामुळे ही बनवाबनवी आमदार अभीमन्यू पवार यांचे राजकीय-आर्थिक गॉडफादर देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का असा देखील सवाल आता उपस्थित झाला तर नवल वाटायला नको.खरं तर मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री ही मंडळी एखादा कार्यक्रम घेताना सामान्य कार्यकर्ता असेल किंवा समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा कार्यक्रम असेल तर त्याची पूर्ण माहिती यंत्रणेमार्फत घेतात,कांही वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असेल तर त्याला टाळतात.मात्र एक आमदार आहे म्हणून व आपला निकटवर्तीय आहे म्हणून त्याला सर्व माफ असते का असा देखील प्रश्न आपोआप निर्माण होतो,यातून क्लीन इमेज अशी प्रतिमा असलेल्या फडणवीस यांच्यावर देखील प्रश्नःचिन्ह निर्माण झाला तर नवल वाटायला नको. नक्कीच कांही जणांची खरी खुरी विवाह झाली असतील देखील.मात्र ज्यावेळी तुम्हाला झालेल्या जोडप्यांचा विवाह पुन्हा करण्याची गरज वाटते त्याअर्थी संख्या वाढवून शक्तिप्रदर्शन करण्यासाठीच हा सर्व प्रपंच केला गेला,व त्यासाठी काहीही करण्याची तयारी होती हे अगदी उघड आहे.त्यामुळे आत्महत्याग्रस्त,अपघातग्रस्त,भूमिहीन,अत्यल्प उत्पादक शेतकऱ्यांच्या व शहीद जवानांच्या मुलामुलींचा सामुहिक विवाह सोहळा खरंच संपन्न झाला का हा संशोधनाचा भाग असून की मग त्या नावाखाली आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि राजकीय शक्तीप्रदर्शन कऱण्यासाठी आमदार अभीमन्यू पवार यांनी आत्महत्याग्रस्त, अपघातग्रस्त, भूमिहीन,अत्यल्प उत्पादक शेतकऱ्यांच्या व शहीद जवानांच्या नावाचा वापर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समोर करून घेतला हा संशोधनाचा विषय आहे.त्यामुळे उद्देश काहीही असेल मात्र यासाठी बनवाबनवी केली आहे हे मात्र खरे.आणि ज्यावेळी बनवाबनवी करण्याची गरज भासते त्यावेळी उद्देश प्रामाणिक असतो असे बिलकुल नाही.

याबाबतचे वृत्त मागची बातमी यामध्येही प्रसिद्ध झाले आहे 

Leave A Reply

Your email address will not be published.