अक्षय तृतीया… साडेतीन मुहूर्त…. आणि गोरमाटी समाज ?
✍️याडीकार पंजाबराव चव्हाण
पुसद
9421774372
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आज अक्षय तृतीया निमित्त बऱ्याच बहुजन समाजातील लोकांनी सकाळी सकाळी शुभेच्छा दिल्या. आणि काही गोरबंजारा समाजातील सुद्धा उच्चशिक्षित लोकांनी शुभेच्छा पाठवल्या त्या वाचून मी हैराण झालो. एका गोरमाटीने तर चक्क आईवडीलाचीं पुजा करत असल्याचे सांगितले. त्यांच्या भावना मी समजु शकतो. पण खरंच गोरबंजारा समाजामध्ये अक्षय तृतीया हा सन मानल्या जातो का? तर याचे उत्तर नक्कीच नाही ! अक्षय तृतीया म्हणजे आपल्या आईवडिलांचे (पिंत्राचे )पूजन करण्याचा हा दिवस आहे. परंतु या दिवशी गोरमाटी समाज हा पिंत्राचे पूजन करत नाही. तो होळी आणि दिवाळीलाच आपल्या पिंत्राचे पुजन करत असतो. अक्षय तुतीयाला गोरमाटी समाजामध्ये कोणतेच पुजन केल्या जात नाही. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
दुसरी गोष्ट अशी की, अक्षय तृतीयाला साडेतीन मुर्तापैकी एक मूर्तही मानले जाते हे जरी खरे असले. तरी गोर बंजारा समाजामध्ये केव्हांही कुठलाही मुहूर्त पाहिल्या जात नाही. कारण गोर बंजारा समाजाने पूर्ण जगाचे भ्रमण केल्यानंतर त्यांनी जगाला जगण्याची कला शिकवलेली आहे. त्यामुळे एक लोकगीत प्रचलित आहे. एक बंजारा गाये। जीवन के गीत सुनाए। हम सब जीने वालेको जीने की राह बताये। एक बंजारा गाये।। जीवन जगण्याची कला शिकवणारा हा गोरमाटी समाज मुहूर्त पाहून आपले शुभ कार्य कधीच करत नाही. तर तो सकाळी सकाळी निघणाऱ्या पोरीयातारा नुसारच त्याची दिनचर्या सकाळपासून सुरुवात होते.
गोरबंजारा समाजामध्ये शुभकार्य करण्याची पद्धत ही मुहूर्त पाहून केल्या जात नाही. तर ती चांदणों म्हणजे चांदण्या रात्री करण्याची प्रथा आहे. कारण गोरबंजारा समाज हा स्वर्ग, नरक ,मोक्ष या फंदात पडत कधीच पडत. नसून तो निसर्गपूजक आहे. त्यामुळे तो कोणत्याही मुहूर्तामध्ये किंवा बाढं, भविष्य, पंचांग , कर्मकांड यांच्या नादी लागत नसून ते आपल्या गौरवशाली ऐतिहासिक गोरधाटी संस्कृती परंपरेनुसार आपले सण,त्यौहार आणि इतर शुभ कार्य करत असतात. त्यांच्यामध्ये कुठलेही कर्मकांड, पूजाअर्चा किंवा होम हवन ते करत नव्हते. पण कालांतराने संविधानात असलेल्या तरतुदी नुसार महानायक वसंतराव नाईकसाहेबांच्या चार टक्के आरक्षण नीतीमुळे गोरबंजारा समाजातील अनेक लोक उच्चपदस्थ अधिकारी झाले. आणि देखा देखी म्हणून गोरधाटी विसरून आज ते सत्यनारायण पूजा, होम हवन, नागबळी पूजा, कालसर्प पूजा, संकट चतुर्थी, एकादशी या सगळ्या भानगडी मध्ये समाज दिवसेंदिवस डुबत चाललेला आहे. अठराव्या शतकामध्ये महान संत जेतालाल महाराज यांनी आपल्या बोलवचनातून सांगितले होते पोती थोती है। झुटे है …..वे…. पुराण।. तरीही गोरबंजारा समाजातील उच्चपदस्थ आणि शिक्षित मंडळी या धार्मिक कर्मकांडांमध्ये प्रचंड गुरफटल्या गेल्याचे चित्र आज सर्वीकडे दिसून येत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. माणसाच्या जीवनामध्ये कोणताही दिवस हा वाईट नसून सर्वच दिवस हे चांगले असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब ज्या दिवशी रिटायर झाले. त्या दिवशी त्यांना दिल्लीमध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, शुभ मुहूर्ता बाबत आपले काय म्हणणे आहे? त्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले की, ज्या दिवशी पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरायचे बंद होईल. तोच दिवस मानवाच्या जीवनातील अशुभ दिवस असेल. कोणताही दिवस अशुभ किंवा शुभ नसतो. सगळे दिवस सारखेच असतात. शेवटी माणसाच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट कल्पना येत असतात. हे अत्यंत धोकादायक आहे.
हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 700 संत होऊन गेल्यानंतरही आपण शुभ आणि अशुभ मुहूर्ताकडे पाहून आपल्या जीवनाची वाटचाल जर करत असू तर निश्चितच मानवी जीवन कधीही सुखी होऊ शकत नाही. आज साडेतीन मुहूर्त मुर्तापैकी एक मूर्त असल्याने आपण सोने खरेदी करण्याबरोबरच एखाद्या दवाखान्यांमध्ये जाऊन एखाद्या पेशंटला हजार पाचशे रुपये जर मदत केली. तर निश्चितच यांच्यापेक्षा आनंदाचा दिवस कोणताही राहणार नाही. असे आंनदाचे क्षण भोगण्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. वैज्ञानिक दुष्टिकोन बाळगुनच आपण आपल्या जिवनाची वाटचाल जर केली तर कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची मानसाला गरजच पडत नाही.
जय विज्ञान… जय संविधान