मनोज जरांगे मंगेश चिवटे यांच्यात बंद दाराआड चर्चा – तीन ते साडे तीन तास बैठक सुरू – बैठकीची चर्चा गुलदस्त्यात
मनोज जरांगे मंगेश चिवटे यांच्यात बंद दाराआड चर्चा
– तीन ते साडे तीन तास बैठक सुरू
– बैठकीची चर्चा गुलदस्त्यात
जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश जारी न करताना केवळ अधिसूचना काढून मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन संपविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ते मंगेश चिवटे यांनी जरांगे यांची आंतरवालीत जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास तीन ते साडे तीन तास बैठक सुरू होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
आंतरवली सराटी मधील आंदोलन स्थळाशेजारील एका घरात दोघांमध्ये तब्बल तीन-साडे तीन तास चर्चा झाली. जरांगे यांनी आंतरवाली सराटीतून निघताना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र मुंबईच्या वेशीवर आल्यावर त्यांनी सरसकट मागे सोडून सगेसोयºयांवर जोर दिला. परंतु ही मागणी न्यायालयात टिकण्यासारखी नाही, असे अनेक कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. पण सरकारने मराठा समाजाला ठोस काहीही न देता डावपेच आखून मराठ्यांचा मुंबईला पडलेला वेढा उठवला. जरांगेंच्या आंदोलनावर हळूहळू विविध स्तरातून मान्यवर मंडळी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना मंगेश चिवटे यांनी जरांगे यांची घेतलेली भेट सूचक मानली जातेय.
मनधरणी करण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षणासाठी दिलेल्या आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी झाली नाही पुन्हा एकदा आमरण उपोषण करेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला होता. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आणि मंगेश चिवटे यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. सरकारकडून जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मनोज जरांगे तुळजाभवानी चरणी
तुळजापूरला येताना आई तुळजाभवानी दर्शन घेतलं होतं. आई तुळजाभवानीचा प्रसाद आणि अक्कलकोट स्वामी समर्थांचा प्रसाद घेऊन आलो होतो. त्यांना प्रसाद दिला. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.