मन की बात ऐवजी जन की बात आपल्या वृत्तपत्रातून निर्भीडपणे मांडा – आमदार कैलास पाटील यांचे पत्रकारांना आवाहन

0 74
मन की बात ऐवजी जन की बात आपल्या वृत्तपत्रातून निर्भीडपणे मांडा
– आमदार कैलास पाटील यांचे पत्रकारांना आवाहन
धाराशिव : पत्रकारांनी लोकांना दिलेली खोटी आश्वासने व खोट्या स्वप्नांच्या आश्वासनाच्या बातम्या करण्याऐवजी समाजाच्या उपयोगी पडतील अशा सकारात्मक बातम्या द्याव्यात. तसेच लोकांनी केलेल्या चांगल्या कामांच्या बातम्यांना चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देऊन त्याचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम तर करावे. विशेष म्हणजे मन की बात ऐवजी जन की बात आपल्या वृत्तपत्रातून निर्भीडपणे मांडावी असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले.
येथील व्हॉईस आॅफ मीडिया जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्डचा वितरण सोहळा रविवारी (दि.३) धाराशिव शहरातील आर्यन फंक्शन हॉल येथे करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, व्हाईस आॅफ मीडियाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, पत्रकार जनतेचा आवाज होऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने आपल्या दैनिकांमध्ये प्रश्न मांडून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देतात. त्यामुळे त्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला देखील मदत होते. मात्र पत्रकारांच्या देखील काही समस्या असून यामध्ये त्यांचे स्वत:चे घर असणे आवश्यक आहे. त्यामुळे घरांसाठी आवश्यक असलेला निधी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांनी धाराशिव जिल्ह्यात नव्याने उभे झालेल्या उद्योगांची ओळख आपल्या लेखणीतून मांडली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तसेच पत्रकारांना स्वत:ला विकास पाहिजे असेल तर त्याची स्वत:ची हक्काची जागा असली पाहिजे. त्यामुळे पत्रकारांनी विकास व उद्योगांची मांडणी नव्याने करावी लागेल असे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी साप्ताहिक विंगच्या जिल्हा संघटकपदी मयूर काकडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तर रमजान पठाण व लतिफ शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्यासाठी ई-केवायसीचे जिल्हा व्यवस्थापक रमजान पठाण, लतिफ शेख, इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक चंद्रकांत झेंडे, अमर बावीकर, किशोर लोंढे, सूर्या खंडागळे, बालाजी लोमटे, महेश देशपांडे, प्रवीण बेडके, सत्यजित साडेकर, अनिकेत कोळगे, स्नेहल कांबळे, प्रतीक्षा घुगे, अमिता दंडनाईक मयूर जंगले यांनी दोन्ही कार्ड काढण्याचे काम केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन शरद अडसूळ व तानाजी घोडके यांनी तर आभार कुंदन शिंदे यांनी मानले. यावेळी ३०० पेक्षा जास्त पत्रकारांचा विमा व आयुष्यमान भारत योजना कार्ड काढण्यात आले. या कार्यक्रमास पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
पत्रकारितेचा दृष्टिकोन बदलावा
व्हॉईस आॅफ मीडियाने पत्रकारांसाठी घर, पत्रकारांचा कौशल्य विकास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्य व पेन्शन ही पंचसूत्री हाती घेऊन सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे अहद् तंजावर तहद् पेशावर अवघा मुलुख आपला याप्रमाणे काम करून स्वराज्य निर्माण केले. अगदी त्याच पद्धतीने या संघटनेचे काम सुरू असून पत्रकार व पत्रकारितेचा दृष्टिकोन बदलावा यासाठी सकारात्मक पत्रकारिता करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिव्या भोसले यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.