‘ज्योती झाली ज्वाला’ नाटक सामाजिक परिवर्तननाचे माध्यम बनेल! -प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी

0 70

‘ज्योती झाली ज्वाला’ नाटक सामाजिक परिवर्तननाचे माध्यम बनेल! -प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी

मुंबई : “प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक डॉ. सतीश पावडे यांनी लिहिलेली “ज्योती झाली ज्वाला” आणि “ज्योति बन गयी ज्वाला” ही हिंदी -मराठी नाटके सामाजिक परिवर्तननाचे माध्यम बनेल, असा मला विश्वास वाटतो”, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी यांनी केले.
मुंबई विद्यापीठ मुंबईच्या मराठी विभाग, हिंदी विभाग आणि संशोधन पत्रिका “शोधावरी ” यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सतीश पावडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या क्रांति कार्यावर लिहिलेल्या “ज्योती झाली ज्वाला” आणि “ज्योति बन गयी ज्वाला”(अनुवादक -डॉ. रत्ना चौधरी) या हिंदी -मराठी नाटकाच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम “कविवर्य कुसुमाग्रज मराठी भवन, विद्यानगरी, कलीना परिसर संपन्न झाला. या वेळी पुस्तकांचे प्रकाशन करताना त्या बोलत होत्या. विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार गजेंद्र अहिरे होते. अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि मराठी विभागाचे माजी अध्यक्ष आणि प्रोफेसर डॉ. कुमार अनिल यांनी भूषविले. “सामाजिक परिवर्तनसाठी लिहिल्या जाणारी नाटके प्रोसीनियम आर्चच्या बाहेर निघून झोपडपटट्या, वस्त्या, गावोंगावी पोचली पाहिजे, सामजिक प्रबोधनाचे नाटक हे प्रभावी माध्यम आहे, त्याचा मोठ्या प्रमाणावर चळवळीचे साधन म्हणून आज उपयोग होण्याची गरज आहे”, असेही पुढे शबाना आजमी आपल्या भाषणात म्हणाल्या.
“सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे धग धगते अग्निकुंड होतेच. पण ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर पुढील दहा वर्षे सावित्रीबाई यांनी सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष म्हणून जे कार्य केले ते अत्यंत महत्वाचे आहे. त्यांची सुरुवात, सूचन डॉ.सतीश पावडे यांच्या “ज्योती झाली ज्वाला” आणि “ज्योति बन गयी ज्वाला” या नाटकांनी केली आहेच परंतु या विषयावर आणखी अनेक नाटक, चित्रपट यायला हवे.” असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार गजेंद्र अहिरे यांनी या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून काढले. डॉ. कुमार अनिल अध्यक्षपदाहून बोलताना म्हणाले, ” समकालीन रंगभूमीवरील चरित्रपरक नाट्यलेखन आणि सादरीकरणात सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांची उपेक्षाच झाली आहे. डॉ. सतीश पावडे यांची ही नाटके या दृष्टीने महत्वाची आहेत. ”
प्रकाशन समारंभाचे प्रास्तविक मराठी विभाग प्रमुख आणि कार्यक्रम संयोजक डॉ. वंदना महाजन यांनी केले. अतिथींचे स्वागत डॉ. विनोद कुमरे, डॉ. श्यामल गरुड़ यांनी केले. अतिथींचा परिचय नाट्य दिग्दर्शक आणि अकादमी ऑफ़ थिएटर आर्ट्स चे माजी संचालक डॉ. मंगेश बंसोड यांनी करुन दिला.लेखकीय मनोगत डॉ. सतीश पावडे तर अनुवादकीय मनोगत डॉ. रत्ना चौधरी यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. भाग्यश्री वर्मा यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक आणि “शोधावरी” चे संपादक डॉ. हुबनाथ पांडे यांनी केले. या कार्यक्रमाला रंगभूमी आणि चित्रपट तसेच सामजिक चळवळीतील अनेक दिग्गज मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सह आयोजक म्हणून शब्दसृष्टी भारतीय साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान(डॉ. मनोहर आणि आशारानी), आंतर्राष्ट्रीय अनुवाद आणि संशोधन केंद्र(प्राचार्य मुकुंद आंधळकर) तसेच मानस आणि अक्षर शिल्प प्रकाशन (विकास राऊत) तसेच मुक्त छाया पत्रकार शेखर सोनी आदिंनी महत्वाची भूमिका पार पाड़ली.

Leave A Reply

Your email address will not be published.