‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा संभाजी ब्रिगेडची मागणी
मंगरुळपीर : सरकार व सर्व सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे जनतेला आपल्या दबावाखाली ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या योजत असतात. सामान्य माणसावर कोरोनाची साथ वाढत आहे, हे सरकार धार्जिण मिडिया वारंवार बिंबवत आहे व लोकामध्ये भिती निर्माण करत आहे. लोकांना मास्क लावण्याची सक्ती सांगत आहे.
मग ‘महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरण’ या शासकीय कार्यक्रमासाठी लाखो लोकांची गर्दी जमवण्यााचे नेमके प्रयोजन काय ? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी केला आहे. महाराष्ट्र भुषण पुरस्कार दरवेळी पात्र व्यक्तींना डावलून चुकीच्या व्यक्तींना दिल्या जातो. धर्माधिकारी यांना पुरस्कार जाहीर होताच संभाजी ब्रिगेडसह विविध सामाजिक संघटनांनी याचा राज्यभर विरोध केला होता. राज्यातील सर्वच स्थानिक आमदारांना संभाजी ब्रिगेडने निवेदन देऊन हा पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली होती.तरीही सरकारने याचा जराही विचार न करता सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रम शासकीय न करता राजकीय शक्ती प्रदर्शनाचे हिशोबाने ठेऊन लोकांचा बळी घेतला.
वास्तविक विरोध झाल्यानंतर सरकारने शासकीय कार्यक्रम म्हणून राज्याचे राज्यपाल व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इन डोअर ठेवणे गरजेचे होते याला राजकीय शक्ती प्रदर्शन करायची गरज काय ? सामान्य जणांना कोरोनाची भीती असताना स्टेजवरील मंत्री-संत्री यांनी कुठलेही मास्क न वापरता सामान्य लोकांना उन्हात बसवण्याची गरज काय ? धर्माधिकारी यांचे समाजासाठी नेमके कार्य व योगदान काय? हा जाहीर प्रश्न ही संभाजी ब्रिगेडने यापूर्वीच जाहीर केला होता व याला विरोध केला होता.
या कार्यक्रमामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना केवळ पाच लाखाची मदत जाहीर करून भागणार नाही तर सरकारने स्वतःचे उत्तरदायित्व सांगून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी व सांस्कृतिक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व सर्व जबाबदार व्यक्तींवर व आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अजय गवारगुरु यांनी केली आहे.