शिवशाहीर : आण्णाभाऊ साठे

0 429
शिवशाहीर : आण्णाभाऊ साठे

 

नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो.९७६४४०८७९४

 

‘हिन्दी जगत अन्ना हजारे से बखूबी परिचित है !
पर उस महान अन्ना से उतना परिचित नहीं है !
जितना होना चाहिए था , ये महान अन्ना कौन है ?
इस अन्ना को दुनिया अन्नाभाऊ साठे के नाम से जानती है !’
‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर  वसलेली नसून ती शेतकरी, कष्टकरी कामगारांच्या तळहातावर वसलेली आहे’ असे सांगणारे तसेच ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढ्यातील एक महारथी लोकशाहीर, साहित्यसम्राट, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे. यांचा जन्म ०१ ऑगस्ट इ.स. १९२० रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव  या गावी झाला, त्यांचे संपुर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांना सर्व अण्णाभाऊ या नावाने ओळखत. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते. शिवशाहीर आण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले नंतर तेथील सर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुस-या पत्नी जयवंता, त्यांना एकूण तीन अपत्ये होती त्यात मधुकर, शांता आणि शकुंतला.
अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले परंतू त्यांनी मराठीभाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जी १९ व्या आवृत्तीत आहे आणि इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. तेव्हा तत्कालिन जेष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही या कादंबरीचे कौतुक केलेले आहे. आण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. तसेच शिवशाहीर आण्णाभाऊंनी ‘अग्निदिव्य’ ही कांदबरी छ. शिवाजी महाराजांचे सरसेनापती तिसरे प्रतापराव गुज्जर यांच्यावर लिहली आहे. केवळ दीड दिवस शाळेत जाणा-या आण्णाभाऊंच्या १५ लघुकथांचा संग्रह आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त त्यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली. आण्णाभाऊंनी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात साहीत्य लिहले असून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून का साजरा करू नये ? मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जयंती दिवस हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि हा दिवस सर्वच स्थरावर साजरा करण्यात यावा असे निवेदनही संभाजी ब्रिगेडने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते, पण त्यावर अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे.
अण्णाभाऊ साठेंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. कारण सारा महाराष्ट्र अण्णाभाऊंनी अमर शेख यांच्या साथीने जागवला-पेटवला होता. त्यांनी तेव्हाच गुजराती लोकांच षढयंत्र ओळखून ते हाणून पाडण्याचेही काम आण्णाभाऊ साठेंनीचं केल होत. पण आज उच्चशिक्षित तरूणांना गुजराती लोकांच षढयंत्र समजत नाही कारण त्यांनी आण्णाभाऊंना कधी समजून घेऊन वाचलचं नाही.
भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ‘उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन’ हे महान विचारवंत तसेच रामायणातील सत्य या पुस्तकाचे लेखक पेरियार यांना मान्य नव्हते म्हणून ते म्हणाले होते की, ‘हे खरे अर्थानं स्वातंत्र्य नाहीये, ख-या अर्थानं आम्ही गुलामीच्या बंधनातून मुक्त झालो नाहीयेत, ही फक्त पांढ-या लोकांकडून काळ्या लोकांच्या हातामध्ये आलेली सत्ता आहे, हे आमचं स्वातंत्र्य नाहीये’ जसे महान विचारवंत पेरियार यांना हे स्वातंत्र्य मान्य नव्हते तसेच शिवशाहीर आण्णाभाऊसाठेंनाही मान्य नव्हते. म्हणून तर त्यांनी १६ आँगस्ट १९४७ रोजी मुंबईमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले होते, त्यावेळी जेवढा पाऊस झाला होता तेवढ्या पावसाची आजपर्यंत नोंद झाली नाही. तरीही कोसळणा-या पावसात मागे न हाटता मुंबईमध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता, त्या मोर्च्यातील घोषणा होती, ‘ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है !’ असा नारा शिवाजी पार्कवर दिला होता.
१९४४ ला त्यांनी  ‘लाल बावटा’ कला पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले.  ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली’ ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छ. शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून गायिले आणि ते पोवाडा गाताना म्हणत की, ‘छ. शिवाजी महाराजांच्या चरणा वंदुणी गातो कवणा जी रं जी’ त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला होता. म्हणून त्यांना खरे शिवशाहीर म्हटले पाहीजे. परंतू एकही पोवाडा न लिहणा-या तसेच जेम्स लेनच्या माध्यमातून छ. शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणा-या काही विकृतींना सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार शिवशाहीर म्हणून महाराष्ट्र भुषण, पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करतेय ही खुप मोठी शोकांतिका आहे.
‘विकृतींनी आमचे खरे शिवशाहीर जिरवले,
त्यांनी भलत्याचं विकृतींना शिवशाहीर म्हणून मिरवले’
उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. हे त्यांच्या
‘जग बदल घालुनी घाव । सांगूनि गेले मज भीमराव ॥’
यावरून सिध्द होते. या कवणामध्ये ते म्हणतात,
‘गुलामगिरीच्या या चिखलात रूतून बसला का ऐरावत,
अंग झटकून निघं बाहेरी घे बिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव’ हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ , ‘मुंबईची लावणी’ आणि ‘मुंबईचा गिरणी कामगार’ – दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण’ असे शहराला दर्शवणारे वर्णन केले हे अविस्मरणीय आहे.
शिवशाहीर आण्णाभाऊ साठेंची एक कादंबरी आहे तीचे नाव ‘चिखलातील कमळ’ या कादंबरीवर १९६१ साली ‘मुरळी मल्हारी रायाची’ नावाचा चित्रपट निघाला होता. अशा लेखक, साहित्यिक, नाटककार, लोकसम्राट, वगसम्राट, शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ‘मराठी भाषा दिन’ जर हे राज्यसरकार साजरा करत नसेल तर खुप मोठी शोकांतिका आहे.
अण्णाभाऊ साठेंनी जशी ‘चिखलातील कमळ’ ही कादंबरी लिहली तसे आज आण्णाभाऊ असते तर त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारच्या राजकीय व सामाजिक कार्यपद्धतीचे निरीक्षण करून त्यांनी ‘कमळातील चिखल’ ही कांदबरी लिहुन सरकारचा समाचार घेतला असता हे कोणीही नाकारू शकत नाही.
शिवशाहीर आण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त ०१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹ ४ टपाल तिकिटावर आण्णाभाऊ साठेंचे चित्र ठेवले होते. तसेच महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध सिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यायन सुरु करण्यात आले आहे.  पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मध्ये एका उड्डाणपूलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.
शिवशाहीर आण्णाभाऊंनी दिलेले विचार आणि त्यांचे साहीत्य आजच्या तरूणांनी स्वतः वाचून इतरांनाही वाचण्यास प्रवृत्त करणे हे आज काळाची गरज आहे. कारण त्यांचे विचार जेव्हा घराघरापर्यंत पोहोचतील तेव्हाच ख-या अर्थाने आण्णाभाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त खरे अभिवादन ठरेल.
Leave A Reply

Your email address will not be published.