कोरोनाची लस घेऊन मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण
Corona Vaccine Deaths : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणामुळे झालेल्या कथित मृत्यूंबाबत कोणतीही जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारनं नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले आहे की, मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संपूर्ण सहानुभूती आहे. मात्र, लसीच्या कोणत्याही प्रतिकूल परिणामासाठी तिला जबाबदार धरता येणार नाही.
कोरोना लसीकरणामुळे कथितरित्या दोन तरुणींच्या मृत्यूसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या वर्षी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित हे प्रकरण आहे. प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेल्या उत्तरात केंद्राने म्हटले आहे की, लसीमुळे मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयात खटला दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली जाऊ शकते. दोन मुलींच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे प्रतिज्ञापत्र केंद्राकडून देण्यात आले. कोरोनाच्या लसीकरणानंतर गेल्या वर्षी दोन तरुणींचा मृत्यू झाला होता.
याचिकेत मागणी करण्यात आली होती की, कोविड लसीमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांचा स्वतंत्र तपास करण्यात यावा आणि लसीकरणानंतर कोणताही प्रतिकूल परिणाम (AEFI) वेळेवर शोधण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तज्ञ वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.