जन्या आणि मन्या एकाच माळेचे मणी

0 537

जन्या आणि मन्या एकाच माळेचे मणी

 

हेमंत टाले

मो. 9975807632

 

मित्रांनो जय गुरु
अलीकडेच महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम संत साईबाबा,आणि आमच्या माता भगिनींच्या विषयी अत्यंत विकृत खालच्या दर्जाचं अपमानजनक विधान करून आपलं तोंड काळ करणारा आणि १५ ते २० या संवेदनशील वयोगटातील मुलांच्या मनात मुस्लिम द्वेष व तिरस्कार निर्माण करून शिक्षणाने माणूस गांडू होतो मग शिकायचं कशाला? असं म्हणत हजारो बहुजन तरुणांचं करिअर बरबाद करण्यासाठी त्यांना निदर्शने मारामाऱ्या करायला लावून दंगलीमध्ये ढकलणारा शिवप्रतिष्ठानचा अध्यक्ष मनोहर (मन्या)उर्फ तथाकथित संभाजी भिडे याचा वादग्रस्त विदर्भ दौरा झाला.

अमरावती येथील सभेच्या पूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्मित सर्व धर्म पंथ संप्रदायाचे प्रतीक आणि मानवतेचे धाम असलेले गुरुकुंज आश्रम मोझरी येथे त्यांचे आगमन झाले. या देशातून धर्मसमभाव संपवा अशा पद्धतीचे विधाने मनोहर कुलकर्णी यांनी यापूर्वी अनेक वेळा केलेली आहे. अशा विकृत मेंदूच्या आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्त्वज्ञानाच्या संपूर्ण विरोधात प्रचार प्रचार करणाऱ्या विषारी आणि विखारी व्यक्तीचे गुरुकुंज आश्रमातील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले. त्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुदेव प्रेमींमध्ये तीव्र नाराजी असुन ठिकठिकाणी सभा घेऊन गुरुदेव सेवा मंडळाच्या जिवंत हृदयाच्या कार्यकर्त्यांनी वरील विषयी मनोहर कुलकर्णी यांचा जाहीर निषेध केलेला आहे.

आपल्याला माहीतच आहे की, गुरुकुंज आश्रम हा जनार्दन (जन्या) बोथे अँड कंपनी झालेली आहे. सर्वप्रथम हे दोघेही गुर्जी आहेत. शिवप्रतिष्ठान मध्ये मनोहर कुलकर्णी यांची एकाधिकारशाही आहे. कुठल्याही कार्यकर्त्यांना चिकित्सकपणे प्रश्न विचारण्याची परवानगी नाही.ते सांगतील तो आदेश पाळायचा असा नियम आहे. गुरुकुंज आश्रमात बोथे गुर्जीची एकाधिकारशाही आहे. जी व्यक्ती त्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन राहायला तयार असेल अशीच व्यक्ती सर्वाधिकारी होते. आणि अधिक काळ टिकून राहते. त्यामुळे सर्वाधिकारी ही फक्त एक शोभेची वस्तू झालेली असून त्यांना कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत.

पुराव्या दाखल अलीकडेच तुकाराम दादांनी स्वतंत्रपणे निर्माण केलेले अध्यात्म गुरुकुलचा सातबारा अधिकाऱ्यांना लाच देऊन बोथे अँड कंपनीने बदलवला.सदर प्रकरण घेऊन एक शिष्टमंडळ तात्कालीन सर्वाधिकार्‍यांकडे गेले असता या प्रकरणात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नका असं सांगण्यात आल. यावरून गुर्जी म्हणतील ती पूर्व दिशा असाच भोंगळ कारभार सुरू आहे.

गांधी, डॉ. आंबेडकर, फुले हे राष्ट्र निर्माते आपल्या भारत देशाचा प्राण आहे.नव्हे तो आमचा श्वास आहे. श्वास रोखला की माणूस गुदमरतो आणि म्हणून मनोहर कुलकर्णी या नालायक माणसाने आपली गच्ची पकडलेली आहे. सारा बहुजन समाज गुदमरलेला असुन स्वतंत्र भारतामध्ये इतक्या उघडपणे वरील राष्ट्रनिर्मात्यांच्या विषयी अत्यंत खालच्या दर्जाचे विधान आजपर्यंत कधीही कोणी केलं नाही. प्रतिक्रांती आपल्या दरवाज्यात उभी आहे.

पूज्य तुकाराम दादा गीताचार्य, नारखेडे दादा, वेरूळकर गुरुजी, सत्यपाल महाराज, हे श्री गुरुदेव सेवा मंडळाचा प्राण आहे. जितका तिरस्कार भिडे वरील राष्ट्रनिर्मात्यांचा करतात तितकाच तिरस्कार ही बोथे अँड कंपनी स्वतंत्रपणे काम करणाऱ्या वरील व्यक्तीचा करतात. तुकाराम दादांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या ४०,००० शाखा उघडल्या त्या वजा केल्या तर सेवा मंडळामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून ते सेवा मंडळाचा प्राण होते. परंतु तुकाराम दादा जिवंत असताना या बोथे अँड कंपनीने त्यांना कोर्टात खेचले होते. याला म्हणतात ब्राह्मण्य ! आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नाही. ब्राह्मण्याच्या विरोधात आहोत. ब्राह्मण्य म्हणजे स्वतः कष्ट न करता इतरांनी कष्टातून मीळवलेला आनंद त्याला लुटू न देता स्वतः लुटायचा आणि म्हणून अध्यात्म गुरुकुल मोझरी, भू वैकुंठ अड्याळ टेकडी, आणि ग्रामगीता तत्त्वज्ञान दर्शन मंदिर पंढरपूर हे तुकाराम दादांनी स्वतंत्रपणे स्वकष्टाने निर्माण केलेली संस्थाने बोथे अँड कंपनीने हडप करण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला आहे.ही बोथी अँड कंपनी फुकटचं खाणारी ब्राह्मणी व्यवस्था बनलेली आहे. अरे एका फकीरानं एवढं मोठं विश्व उभं केलं आणि तुम्हाला राष्ट्रसंतांनी एवढी मोठी संस्था ताब्यात दिली तुम्ही त्याचा किती विस्तार केला. हा प्रश्न आता या बोथे अँड कंपनीला गुरुदेव सेवकांनी विचारला पाहिजे.

नारखेडे दादांनी आपलं सर्वस्व समर्पित केलं परंतु जिवंतपणीच नारखेडे दादांचा इतका अपप्रचार या बोथे अँड कंपनीने केला की नारखेडे दादा मेल्यानंतर हे गुरुकुल म्हणजे त्यांच्या नातेवाईकाची संपत्ती होईल. दादा गेले गुरुकुल उभ आहे. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी म्हणजे प्रचारक निर्मितीचा कारखानदार. स्वतंत्रपणे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सातत्याने संस्कार शिबिराच्या माध्यमातून प्रचारक निर्मितीचा यज्ञकुंड पेटवून तो सतत तेवत ठेवणारा तपस्वी सेवा मंडळात अन्यत्र कोणीही नाही. परंतु नांदोरा आश्रम हडप करण्यासाठी याच बोथे अँड कंपनीने त्यांना कोर्टात खेचले होते. दास टेकडी येथील संस्कार शिबिराच्या मुलामुलींसाठीचे शौचालय जे सी पी ने पाडण्याचा घाट याच बोथे अँड कंपनीने केला होता. इतका द्वेष इतका मत्सर त्या मन्या (मनोहर कुलकर्णी) मध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून त्या मन्या पेक्षा हा जन्या काकणभर शिवाई आहे. हे ही आपण लक्षात घेतलं पाहिजे.

सत्यपाल महाराज हे गुरुदेव सेवा मंडळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टार प्रचारक आहेत.परिवर्तनाच्या चळवळीमध्ये प्रचार प्रसार सत्ता ही अत्यंत महत्त्वाची सत्ता असून ही आपल्या हातात असली पाहिजे हे राष्ट्रसंतांनी ओळखले होते आणि म्हणून गुरुकुंजात प्रचार विभागाची त्यांनी स्थापना केली होती.आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात त्यांच्या विषारी प्रचाराहून| झाला पाहिजे प्रबळ पूर्ण| सत्य आपला प्रचार महान| तरीच परिवर्तन सहज घडे| राष्ट्रसंताची वरील ओळीचं जिवंत उदाहरण म्हणजे सत्यपाल महाराज होय. सत्याचा ठेवा जपत गेली ५५ वर्ष हा माणूस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार सर्व जाती धर्म पंथ संप्रदायांच्या स्टेजवर जाऊन अत्यंत ताकदीने करतो आहे. राष्ट्रसंताचा विचार साता समुद्र पार नेणारा असा प्रचारक गुरुदेव सेवा मंडळामध्ये अन्यत्र कोणी नाही. परंतु राष्ट्रसंत समूह या ग्रुपवर महाराज स्वतः ॲड असून सत्यपाल महाराजांची अत्यंत खालच्या दर्जामध्ये निंदा नालस्ती करण्यात आली. सत्यपाल महाराजांना विश्वभूषण द्या त्याच्या खंजिरी वाजवणाऱ्या चेल्यांना भारत भूषण द्या. आणि तुकडोजी महाराजांना ग्रामभूषण द्या. अर्थात तुकडोजी विरुद्ध तुकाराम दादा तुकडोजी विरुद्ध नारखेडे दादा आणि आता विलास साबळे नावाच्या महाशयांनी तुकडोजी विरुद्ध सत्यपाल अशा पद्धतीचं घाणेरड आणि विकृत प्रचार तंत्र राबवलेलं आहे. भगव्या टोपीच्या खाली इतका मुस्लिम द्वेष लपलेला आहे हे राष्ट्रसंत समूह या ग्रुप वरून सिद्ध झालेलं आहे. शेवटी वाद इतका विकोपाला गेला की हा व्हाट्सअप ग्रुपच एडमिनला डिलीट करावा लागला. त्यामुळे गुरुकुंज आश्रम हा आरएसएसचा राजकीय अड्डा बनलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे.

छत्रपतींची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन आणि कोशारी या प्रकरणात मनोहर कुलकर्णीचे शिवप्रतिष्ठान रस्त्यावर उतरले नाही. त्यामुळे त्यांचं छत्रपती प्रेम हे किती बेगडी आहे हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे.अगदी त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये देशांमध्ये कुठलीही अप्रिय घटना घडली मग तो राष्ट्रपुरुषाचा अपमान असो. महिलांवर होणारा बलात्कार असो. या बोथे अँड कंपनीने कधीही पत्रकार परिषद घेऊन कुठलीही भूमिका आज पर्यंत मांडली नाही. जेव्हा महात्मा गांधींचा नथुराम गोडसे खून केला तेव्हा स्वता महाराज धावले. त्यांनी विश्वशांती नाम सप्ताह घेऊन या संपूर्ण देशातील जनतेचे सांत्वन केले. या देशांमध्ये दंगल होऊ दिल्या नाही. परंतु राष्ट्रसंताचे हे संस्कार ही बोथे अँड कंपनी संपूर्णपणे विसरलेली आहे. राष्ट्रसंताचे धर्म समन्वयाचे विचार बासणात गुंडाळून गुरुकुंजात जर देश विघातक कारवाया करणाऱ्या संघटनांचे शिबिरे होत असेल तर आता सर्वसामान्य जनतेने व गुरुदेव प्रेमींनी सावधपणे ठोस भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे.

मनोहर कुलकर्णी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख भगवान शिवाजी महाराज असा करतात. नैवेद्य दाखवायला मंत्र म्हणायला लावतात. मंदिर बांधायला सांगतात. अर्थात शिवाजी महाराजांचा दैवतीकरण करून त्यांचं कर्तृत्व खतम करण्याच षडयंत्र गुर्जी करतात. बोथे अँड कंपनीचे मालक आमचे गुर्जी सुद्धा राष्ट्रसंतांना भगवान समजतात. त्यांचे होयबा कार्यकर्ते भगवान तुकडोजी महाराज असं जाणीवपूर्वक म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जयंती उत्सव त्यांना पाळण्यात घालून झोके देऊन केला जातो. ज्या राष्ट्रसंतानी भगवान बुद्धांची २५०० वा जयंती महोत्सव १०० गावांमध्ये प्रत्येकाने एक तास काम करायचं असा कोटी तासाचा समय दान यज्ञ करून साजरा केला केला त्या राष्ट्रसंताचा जन्मोत्सव जर त्यांना पाळण्यात घालून झोका देऊन केला जात असेल यापेक्षा दुसरी लाजीरवाणी आणि तत्त्वज्ञानाला आणि संविधानाला मातीत मिळवणारी गोष्ट दुसरी कुठली असू शकेल. आणि म्हणून जन्या असो की मन्या आपलं वर्चस्व अबाधित टिकून ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. याच पुरोहितशाहीला आमचा विरोध आहे. जात कुठलीही का असेना जन्या आणि मन्या एकाच माळेचे मणी !

Leave A Reply

Your email address will not be published.